प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छ सवयींमधून स्वच्छ भारत’ या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर येथील पारसिक हिल परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नवी मुंबईतील सहा महाविद्यालयांच्या एनएसएस युनिटमधील १५० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत ९०० किलोहून अधिक कचऱ्याचे संकलन करून टेकडी परिसर स्वच्छ केला.
या वेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सात सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. रस्त्यावर कचरा न टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, ओला व सुका कचरा वेगळा करणे, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळणे, हातांची स्वच्छता राखणे तसेच ‘थ्री आर’ संकल्पनेअंतर्गत कचरा कमी करणे, पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या विशेष स्वच्छता मोहिमेत एसआयईएस महाविद्यालय नेरूळ, एमजीएम महाविद्यालय कामोठे, स्टर्लिंग कॉलेज ऑफ फार्मसी नेरूळ, दत्ता मेघे इंजिनिअरिंग कॉलेज ऐरोली, एफ. जी. नाईक महाविद्यालय कोपरखैरणे व एस. के. कॉलेज नेरूळ या सहा महाविद्यालयांच्या एनएसएस युनिट्सचा सहभाग लाभला. उपस्थितांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेत शहर स्वच्छतेसाठी योगदान देण्याचा संकल्प केला.














Leave a Reply