नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित करून महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी निवडणूक विषयक सविस्तर माहिती दिली. या बैठकीत त्यांनी आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन करून निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन केले.
या बैठकीदरम्यान राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना आयुक्तांनी सविस्तर उत्तरे देत शंका निरसन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, यंदा प्रथमतः एका प्रभागात चार सदस्यांची बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला आपल्या प्रभागातील अ, ब, क, ड अशा चार उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे.
या नव्या मतदान पद्धतीबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी प्रशासनाबरोबरच राजकीय पक्षांनीही आपल्या माध्यमातून मतदारांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, नियमबद्ध आणि लोकशाही मूल्यांना अनुसरून पार पडावी, यासाठी प्रशासन व राजकीय पक्षांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.














Leave a Reply