आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्ती, विकास आणि आरोग्याचा त्रिवेणी संगम

कोपरखैरणे येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्ती, विकास आणि आरोग्याचा त्रिवेणी संगम

नवी मुंबई | ६ जुलै २०२५
नवी मुंबईतील कोपरखैरणे, सेक्टर १५ ते १८ येथील कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मैदानातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी भक्ती आणि समाजसेवेचा एक अद्वितीय सोहळा पार पडला. अण्णासाहेब पाटील मित्र मंडळाच्या वतीने, माजी नगरसेवक रविकांत पाटील आणि माजी नगरसेविका ॲड. भारती पाटील यांच्या विशेष सहकार्यातून या भव्य ‘श्री विठ्ठल रखुमाई दर्शन सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूरच्या वारीत सहभागी होणे अनेकांसाठी शक्य नसते, यामुळे अशा हजारो भाविकांसाठी परिसरातच विठ्ठल माऊलीचे दर्शन घेण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आली. मंदिर परिसर भक्तांनी भरून गेला होता आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या गजरात परिसर भक्तिभावाने न्हालेला दिसून आला. भाविकांसाठी फराळ वाटप आणि सुमधुर भजनांचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला. सेवाभावी वृत्तीने ॲड. भारती पाटील यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांना केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या भक्ती सोहळ्यातच नागरी विकासाचाही महत्त्वपूर्ण अध्याय जोडला गेला. माजी नगरसेवक रविकांत पाटील आणि माजी नगरसेविका ॲड. भारती पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मंजूर झालेल्या नागरी विकास कामांचा शुभारंभही याप्रसंगी करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील आणि सभामंडपाच्या परिसरात पीसीसी स्टॅम्प काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामामुळे परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.

याच वेळी आरोग्यदायी उपक्रम राबवताना मोफत आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये त्वचा रोग तपासणी, रक्तदाब, हृदय तपासणी, हाडांची तपासणी, वजन मोजणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मोफत औषधे वितरित करण्यात आली. शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या त्रिसूत्री सोहळ्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, डॉ. प्राची पाटील, समाजसेवक रॉबिन मढवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढली.

पंढरपूरच्या वारीचा भक्तीमय गजर कोपरखैरणेच्या गजरात मिसळत असताना, नवी मुंबईकरांनी येथे भक्ती, विकास आणि आरोग्य या त्रिवेणी संगमाचा अद्वितीय अनुभव घेतला. या सोहळ्याने एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेचे सुंदर दर्शन घडवले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *